सरता फाल्गुन म्हणजे झाडाझाडांवर रंगांची उधळण आणि श्वासाश्वासात सुगंधांचा मृदंग. पळस-पांगाऱ्याच्या केशरी पताका, काटेसावरीच्या गर्द लालसर-गुलाबी फुलवऱ्यात नादावलेली उन्हं, धम्म पिवळी गणेर, टबूबिया -जकरंदा वगैरे परदेशी मंडळीही रंगांच्या उत्सवात सजलेली.
अशा झमझमाटात वेताळ टेकडीवर खाणीच्या कडेला, जरा आडबाजूला एक अंकोळ पांढुरक्या, मंद सुवासिक फुलांनी बहरलेला असतो. आजूबाजूला चाललेल्या रंगगंधाच्या उत्सवाशी त्याचं काही घेणंदेणं नसतं. पिवळट तपकिरी पानांनी अंकोळाच्या पायाशी गादी घातलेली असते आणि सगळ्या काटेरी उघड्या फांद्या रेघारेघा कोरलेल्या फिकट हिरव्या रंगाच्या लांबट कळ्यांनी आणि छोट्या छोट्या कारंज्यांसारख्या दिसणाऱ्या फुलांनी सजलेल्या असतात. कळ्या उमलतात तेव्हा त्याची निदले (Sepals) बाहेरच्या बाजूला कमान टाकून आतल्या दिशेला वेटोळी करतात. मग त्याच्या आत निमुळत्या, पांढरट, मऊ लव असलेल्या पाकळ्यांचं चक्र. त्याच्या आत डोक्यावर पिवळट केशरी परागकोश घेऊन उभे असलेल्या पुंकेसरांचं चक्र आणि मधोमध डोकं वर काढून उभा असलेला स्त्रीकेसर. अगदी जवळ गेल्याशिवाय याचा मंद गंध जाणवणार नाही आणि फुलांची नजाकत तर मुद्दाम निरखल्याशिवाय लक्षातच येणार नाही.
इथे अंकोळ आहे हे कळल्यानंतर जानेवारी ते एप्रिलच्या काळात वेगवेगळ्या वेळी याची फुलं दिसतात का ते बघायला येत होते. तीन वर्षे त्यांनी हुलकावणी दिली. कधी बहर संपून गेलेला असायचा तर कधी उन्हाच्या तडाख्यात कळ्या करपून गेलेल्या असायच्या. गेल्यावर्षी मात्र सगळ्या शुभवेळा जुळून आल्या आणि फुललेल्या अंकोळाच्या दर्शनाचं भाग्य लाभलं. नुसता अंकोळच नव्हे, तर त्याच्यावरच्या मधमाशांच्या झुंडी आणि शिंजीरांच्या कसरतीही. मात्र, इथे एक थोरला अंकोळ आहे तोच फक्त फुलतो. त्याच्या आजूबाजूचे चिल्ले पिल्ले अंकोळ अद्याप फुलं धरत नाहीत. फुलांचा बहर संपल्यावरही अंकोळाला भेट दिली, पण इतका फुलूनही थोरल्या अंकोळवर अद्याप फळं धरलेली बघितली नाहीत. काय कारण असावं, माहिती नाही.
रामायणात किष्किंधाकांडामध्ये राम आणि लक्ष्मण कमळफुलांच्या पम्पा सरोवरापाशी येतात. सीतेच्या आठवणींनी राम विकल झालेला आहे. इथे पम्पा सरोवराकाठच्या वृक्षराजीचं वर्णन आहे. त्यात वावळ, बकुळ, पळस, काटेसावर, शिरीष, चंदन अशा अनेक झाडांबरोबर अंकोळाचाही उल्लेख आहे. अशा रमणीय प्रदेशात सीतेबरोबर राहाता आलं तर मला कोणत्याच भोगांची अभिलाषा राहाणार नाही असं तो लक्ष्मणाला सांगतो आहे. गेल्यावर्षी हंपीला गेलो, तेव्हा हे सारं वर्णन डोक्यात होतं. मुख्यतः अंकोळ बघायचा होता. मातंग टेकडीवर हिरवेगार अंकोळ बघायला मिळाले. बदामीलाही, चौथ्या लेण्यांकडे जाताना उभ्या कड्याला खेटून उभा राहिलेला एक देखणा अंकोळवृक्ष बघितला.
आदिशंकराचार्यरचित "शिवानंद लहरी" मध्ये एका श्लोकात अंकोळाबद्द्ल एक मजेशीर गोष्ट लिहिली आहे.
अङ्कोलं निजबीजसन्ततिरयस्कान्तोपलं सूचिका
साध्वी नैजविभुं लता क्षितिरुहं सिन्धुः सरिद्वल्लभम् ।
प्राप्नोतीह यथा तथा पशुपतेः पादारविन्दद्वयं
चेतोवृत्तिरुपेत्य तिष्ठति सदा सा भक्तिरित्युच्यते ॥ ६१॥
यात अंकोळाची बी आणि अंकोळाचे झाड, लोखंडी सुई आणि चुंबक, पतिव्रता स्त्री आणि तिचा पती, वेल आणि तिचा आधारवृक्ष, नदी आणि समुद्र अशी रूपके वापरून अद्वैत सिद्धांत सांगितला आहे.
यात झाडाखाली विखरून पडलेल्या अंकोळाच्या बिया, जेव्हा पावसाळ्यात विजा चमकतात, तेव्हा झाडाच्या ओढीने परत झाडाकडे येतात आणि खोडावर चिकटून बसतात अशा लोकसमजाचा आधार आहे.
आंदाळ या तामीळ संत-कवयित्रीने रचलेल्या "नच्चियार तिरुमौल्ली" या भक्तिकाव्यावरच्या एका आख्यानातही अशाच एका समजाचा उल्लेख आहे. कालियाच्या विषाने जळून गेलेला कदंब कृष्णाच्या पदस्पर्शाने परत जिवंत होतो, यावर शंका घेणाऱ्यांना आख्यानकर्ता विचारतो, आंब्याची कोय अंकोळाच्या तेलात भिजवून रुजवली, की क्षणात तिचा वृक्ष बनून त्याला आंबे लागतात हे तुम्हाला माहिती नाही का? मग कृष्णाच्या पदस्पर्शाने कदंबाला संजीवनी मिळाली यावर अविश्वास का दाखवता? यामध्येही, विजा लवताना जेव्हा अंकोळाच्या बिया झाडाच्या खोडावर चिकटतात तेव्हा त्या गोळा करून त्यांचं तेल काढलं आणि त्यात आंब्याची कोय भिजवून ती रुजवली तर क्षणात रुजते आणि फळ धरते असा समज आहे.
असे आणखीही काही लोकसमज दक्षिणेकडच्या राज्यात असावेत. म्हणूनच कित्येक देवळामध्ये अंकोळाचे जुने वृक्ष स्थानवृक्ष म्हणून सांभाळलेले आहेत. याचं वनस्पतीशास्त्रीय नाव Alangium salviifolium - यातलं Alangium हे तमीळ Alinzil वरुन आलेलं आहे.
ते काही असो, पण आंब्याच्या कोयीलाही क्षणात रुजवून फळ धरायला लावणारं ते अंकोळाचं फळ अद्याप तरी टेकडीवरच्या अंकोळाच्या (आणि माझ्याही) नशिबात नाही.
गेल्याच आठवड्यात टेकडीवर जाऊन आले. अंकोळ बहरला आहे. काही दिवसात बहर संपेल आणि अंकोळ परत हिरवेगार होतील. मी फळाची अपेक्षा करत पुन्हापुन्हा त्याला भेट देण्याचं माझं काम करत राहीन.
Family: Cornaceae
संस्कृत नावे: अङ्कोल, गन्धपुष्प, गूढमल्लिका, गुणाढ्यक, गुप्तस्नेहा, कङ्करोल, लम्बकर्ण, पीतसार, रेचिन् विज्ञानतैलगर्भ, विशालतैलगर्भ (Flowers of India वरून)