तरोट्याचा गालीचा..
दाट झाडी असलेल्या परिसरात अनेक वृक्षांवर वेलींची कोवळी पाने चकाकू लागली होती. पक्षांच्या आवाजात आणखी भर पडल्यासारखी जाणवत होती. झाडांच्या मोकळ्या, रिकाम्या काटक्या - हिरव्या रंगाने बहरत होत्या. पळसाला तर सशाच्या कानांप्रमाणे पापड्या लोंबकळत होत्या. मोरांच्या साद- प्रतिसादात लक्षणीय वाढ झालेली होती. उन्हाळयात वाळलेल्या काट्या-कुटयांप्रमाणे दिसणाऱ्या वनस्पतींना संजीवनी मिळणार म्हणून त्या उभं राहायचा प्रयत्न करीत होत्या.
![]() |
ही फुलं टाकळ्याची नाहीत. पण फोटातली पानं मात्र टाकळ्याचीच आहेत. पानांच्या टोकाला असलेला महिरपी कंस लक्षात राहतो. |
या काळात आपसूकच जमिनीलगतची निरीक्षणं होऊ लागली. जमिनीत सुप्तावस्थेत असणाऱ्या अनेक कंदाना कोंब फुटू लागले. अनेक फुलपाखरे जमिनीलगत उडताना दिसू लागली, तसेच किटकांचेही अस्तित्त्व जाणवू लागले.
फांदभाजीच्या वेलीला कोवळी पाने दिसू लागली, हुंबाची फळे पिकायला आली होती. करटुल्याचे कंद दगडाआडून नवीन पानांना जन्म देत होती. रान द्राक्षांच्या फुलांचा मादक सुगंध हळूच जाणवत होता. चालताना स्पर्श होऊन अनेक कडसर गंध आमच्यासोबत चालू लागले होते. त्यातीलच एक टाकळा उर्फ तरोटा हळूहळू पसरू पाहत होता. मोकळ्या किंवा फारशी झाडी नसलेल्या परिसरात टाकळा गर्दी करत होता. तेथील जमिनीला पांघरूण घालीत होता. दरवेळी निरीक्षणात हे पांघरूण जाड झालेले दिसायचे.
वनस्पतींची नावे अर्थपूर्ण वाटतात. टाकळा किंवा तरोटा ही वनस्पती औषधी आहे याबद्दल उल्लेख आयुर्वेदात आणि परंपरागत आलेल्या ज्ञानातून येतात. टाका म्हणजे शरीराचा सांधा, पाठीचा मणका.. आणि टाकळणे म्हणजे दमणे, थकणे (संदर्भ: मराठी शब्द रत्नाकर). यावरून टाकळा ही वनस्पती सांधे मजबूत करणारी किंवा थकवा दूर करणारी..
झाडांच्या दाट वस्तीत टाकळा चुकून माकून एकटा असा कधी सापडला
नाही. परिसरामध्ये टाकळा एकाच वेळी सगळीकडे ही एकदम उगवून आलेला दिसला नाही. काही
ठिकाणी जूनच्या शेवटीही कोवळी पाने दिसली. तरोट्याची/ टाकळ्याची भाजी खाल्ल्याने
पोटातील कृमी नष्ट होतात, तसेच त्वचाविकार, कफनाशक असल्याचे वाचनात आले. त्याच्या
बियांची कॉफी काही दिवसपूर्वी चाखली होती. टाकळ्याची कोवळी पाने मुबलक असल्याने
भाजीसाठी घेतली आणि खालीलप्रमाणे रांधली.
रानभाजी १. टाकळा / तरोटा
शास्त्रीय नाव - Cassia tora (कॅसिया टोरा)
कूळ -
Caesalpinaceae (सिसालपिनेसी)
तरोट्याची कोवळी पाने खुडून घ्यावीत. भाजी मूळापासून उपटू
नये.
भाजी स्वच्छ निवडून घ्यावी. (शक्यतो निवडताना एकेक पान
वेगळे केल्यास भाजीचा गोळा होत नाही). पाण्यात उकळून घ्यावी. उकळल्यावर त्यातील
काळसर पाणी काढून टाकून भाजी पिळून घ्यावी. अंदाजे एक गड्डी भाजी असल्यास एक छोटी
वाटी तुरीची डाळ अर्धवट शिजवून, त्यातील पाणी काढून ठेवावे. कढईत तेलात जिऱ्याची
फोडणी घालावी मग लसूण-मिरची ठेचून फोडणीत घालावे. साधारणतः दोन कांदे उभे चिरून
घालावेत. कांद्यावर अर्धवट शिजवलेली तूर डाळ घालावी. एक वाफ आल्यावर पिळून ठेवलेली
भाजी मोकळी करून घालावी. मीठ घालून परत एकदा वाफ येऊ द्यावी.
- रूपाली भोळे
(proopalee@gmail.com)
छान लेख, छान पद्धतीने मांडला आहे.
ReplyDeleteThank you Madhuri!
Deleteरुपाली, अत्यंत सूक्ष्म पद्धतीने केलेलं निरीक्षण आणि सुंदर मनमोहक पद्धतीने मांडलेला एक एक विषय. वाचायला खूपच मजा येत आहे. Please keep writing.
ReplyDeleteSir..Thank you so much..
ReplyDelete“ महिरपी कंस “ भारीच 👌🏻
ReplyDeletenice
ReplyDelete