Sunday, 18 April 2021

हे विश्वाचे आंगण - आम्हां दिले आहे आंदण???

निसर्गात जे जे काही आहे, ते ते माणसाच्या उपभोगासाठीच अशा निर्लज्ज आणि बेफिकीर वृत्तीचा प्रत्यय टेकडीवर पावलोपावली येतो. टेकडी चढताना सुरुवातीलाच एक नाला ओलांडावा लागतो. तो नाला वर्षभर प्लास्टिक कच-याने भरलेला असतो. पावसाळ्यात त्यातून वाहाणारं पाणी सगळा कचरा रामनदीतून पाषाण तलावात वाहून नेण्याचा प्रयत्न करतं. चढ चढताना एका झाडीत प्लास्टिकच्या बाटल्या, ड्रम, जुने कपडे टाकलेले दिसतात. पावसाळ्यात ते कळत नाही, पण उन्हाळ्यात दाटी कमी झाली की त्या कच-याने अस्ताव्यस्त पसरलेले हातपाय दिसतात. (त्यातल्याच कपड्यांचे धागे घेऊन मुनियाने जवळच्या तेंदूच्या झाडावर घरटं बांधलंय). 

माळावरून आणि चढावरच्या झाडीतून चालताय? जरा जपून. त्याचं काय आहे, या जागा ना, फार निवांत आहेत. फारसं कुणी फिरकत नाही इथे. त्यामुळे आपल्याला हवी ती देशी/ विदेशी दारू, सोबत सोडा नाहीतर पाणी (तेही बाटलीबंदच), प्लास्टिकच्या पिशव्यात पॅकबंद केलेल्या कुरकुरीत चविष्ट पदार्थांचा चखणा, प्लस्टिकचे ग्लास, असं सगळं घेऊन आपल्यासारख्याच मित्रमंडळींबरोबर इथे यावं आणि नशेत धुंद व्हावं अशी इथे पद्धत आहे. हे ही एकवेळ ठीक. पण त्या सगळ्या काचेच्या, प्लास्टिकच्या बाटल्या, प्लस्टिकच्या पिशव्या सगळं तिथेच सोडून जायचं अशीही इथे पद्धत आहे. हे ही एकवेळ ठीक. पण त्या काचेच्या बाटल्या फोडून टाकायचीही पद्धत आहे. त्या काचा झाडीत विखूरलेल्या असतात. म्हणून म्हणलं, माळावरून आणि चढावरच्या झाडीतून चालताना जरा जपूनच चाला.

टेकडीवर विस्तीर्ण माळ आहे. पावसाळ्यात तिथे इतकं दाट गवत वाढतं, की त्यातून चालणंच अशक्य होऊन जातं. इथे किती आयुष्य़ं फुलतात. टिटव्या, चंडोल, धानचिमण्या, होले, चाष, हुदहुद, बुलबुल, वटवटे, मुनिया, कोतवाल, साळुंक्या, मोर, सुगरणी....किती नावं घावीत. शिवाय फुलपाखरं, चतुर, खंडोबाचे घोडे, साप. इथे ससेही केवढेतरी आहेत. सगळ्यांचं जीवनचक्र या माळावरच्या गवताशी बांधलेलं आहे. गवताच्या प्रकारांची मोजदाद करणं आम्हाला अजून जमलेलं नाही, पण तेही असंख्य प्रकार आहेत. हिवाळा सुरू होतो, तसा गवताचा रंग सोनेरी होत जातो आणि गवत वाळू लागतं. त्या वाळलेल्या गवताच्या बियांवर अजूनही चंडोल, सुंगरण, मुनिया यांचे थवे चरत असतात. गवत वाळू लागतं, तशी या सदस्यांबरोबर आणखीही अनेकांची पावले टेकडीकडे, माळाकडे वळतात. टेकडी तर सर्वांचीच. इथे कोणीही सर्रास येऊच शकता. माळावर गाड्या फिरवू शकता, डॉग ट्रेनिंगचे सेशन्स घेऊ शकता. दारू प्यायला, पिझ्झा खायला, कोल्डड्रिंक प्यायला, स्मोक करायला, सेल्फी काढायला, नाचायला, वॉक करायला, प्राणायाम करायला, सूर्य स्नान करायला, प्रेम करायला टेकडीवर मोकळ्यावरच्या, खोपच्यातल्या, झाडीतल्या जागा भरपूर आहेत.  मग एखाद्या रविवारी सकाळी टेकडीवर गेलं की एरवी शांत असणारी टेकडी क्रिकेटप्रेमींनी गजबजलेली दिसते. दुचाकी, तीनचाकी, चारचाकीतून ही मंडळी आलेली असतात. माळाकडेला गाड्या लावून तीनचार टीम्स क्रिकेट खेळत असतात. हे सगळं करतांना निष्पर्ण (पानं गळून पालवीकडे वळू पाहणाऱ्या) झाडांची, गळून गेलेल्या पाचोळयाची, पिवळ्या धम्म गवताची अडचण वाटू लागते. या प्रश्नावरचं उत्तर सोप्पं असतं. चुटकी में सुलझाओ, तुम्हाला फक्त एक आगकाडी किंवा जळती सिगारेट पुरेशी आहे. बघता बघता इथे डोलणारं सोनेरी गवत जळून खाक होतं. आम्ही सकाळी टेकडीवर जातो तेव्हा पायाखालची जमीन काळीठिक्कर पडलेली असते. गवतात पूर्वी कधी पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या तिप्पड होऊन पडलेल्या असतात. त्या काळ्या गवतातच इवले पक्षी काहीबाही शोधत राहिलेले असतात. काय शोधतात? माहीत नाही. 










टेकडीवरचा राडारोडा हे तर एका रात्रीतील आश्चर्य आहे, काल पाहिलेलं झाड, फुललेली वेल आज पाहायला जावी, तर ती राडारोड्याचा ढिगाखाली अदृष्य झालेली असते. हळूहळू या आश्चर्याचे ढीग वाढू लागलेत, टेकडीवरील राड्यारोडया मुळे पावसाचे पाणी वाहून नेणारे असंख्य प्रवाह बंद होणार आहेत. या प्रवाहावर अवलंबून असलेली जीव साखळी येत्या श्रावणात आतुरतेने पाण्याची वाट पाहील. मोई, चारोळी, बीजा, मोह अशा अनेक वनस्पतींच्या पायाजवळील काळी कसदार जमीन आता राखाडी, कचरायुक्त, सिमेंट युक्त होऊन निर्जीव दिसू लागली आहे. 










ह्या सगळ्यांना जबाबदार कोण? माणूस? हो, माणूसच. असं सोपं उत्तर देऊन आपण मोकळे होतो. अरे माणसा माणसा कधी होशीन माणूस? अशी ओळ सहज उद्धृत करतो. पण असं एकूणच मनुष्यप्राण्याला गुन्हेगार ठरवल्यानं हा प्रश्न सुटणार आहे का? म्हणजे जणू टेकडीवर प्रेम करणारे, टेकडीवरच्या जैवविविधतेचा अभ्यास करणारे,  टेकडी छान, नीटनेटकी रहावी म्हणून प्रयत्न करणारे कोणी वेगळ्या ‘माणूस’ जातीतले – आणि टेकडीवर कचरा करणारे, राडा-रोडा टाकणारे, टेकडीवर वणवे लावणारे वेगळ्या ‘माणूस’ जातीतले आहेत की काय? टेकडीवरच्या मोकळ्या वा-याची भूल सर्वांनाच पडते. इथे सगळ्या प्रकारचे लोक सगळ्या प्रकारच्या कारणांसाठी येणार. त्या सगळ्यांसाठी इथे काही बेसिक गोष्टी करता येतील का? आमच्या सारखे आणखीही काही जण टेकडीवरचा कचरा गोळा करतात, तेव्हा मोठा प्रश्न येतो तो कचरा खाली घेऊन येण्याचा. मग पुढे त्याचे वर्गीकरण करणे, मग त्याची वेगवेगळ्या पद्धतीने विल्हेवाट, वगैरे. मग इथे बंद कचरापेट्या ठेवून त्यातला कचरा उचलण्याची सोय करता येऊ शकते का? टेकडीचा बराचसा भाग DRDO च्या अखत्यारीत आहे. तिथे या सगळ्याचे प्रमाण कमी आहे. बाकीचा भाग नक्की कोणाकडे आहे - वनखात्याकडे, ग्रामपंचायतीकडे, की कोणाच्या खाजगी मालकीचा? याची अद्याप आम्हाला कल्पना नाही. लोक वेगवेगळ्या कारणांसाठी येतात ते खरोखरच गरज म्हणून येतात. मैदानं शिल्लक नाहीत, जी आहेत ती वाईट अवस्थेत हे ही खरेच. अगदी मद्यपानासाठी झालं, तरीही टेकडीसारखी निवांत जागा ही गरज असूच शकते ना? मग यासाठी टेकडीचा वापर करणारे दोषी की सगळ्यांना खेळण्याच्या, मनोरंजनाच्या सोयी उपलब्ध करून न देऊ शकणारी यंत्रणा दोषी? खेळायला मैदान हवं, तरीही सगळा माळ जाळायची काहीच गरज असते का? एकदा का वणव्याने पेट घेतला की त्याला सुरक्षित-असुरक्षिततेच भान राहणं अवघड आहे. वणवे लावणारे तितक्याच जबाबदारीने तो पसरू नये याची काळजी घेतात का? हव्या तेवढ्याच जागेतलं गवत जाळणं जमू शकेल का? किंवा थोडा कष्टाचा आणि खर्चिक पर्याय असला, तरी हव्या तेवढ्या जागेतलं गवत कापणं हा पर्याय असू शकेल का? आपल्या बेफ़िकीरीपायी या वणव्यात कितीतरी सरपटणारे प्राणी, कित्येक पक्षांची दगडाच्या खोबणीतील अंडी, अनेक वनस्पती, गवत, तृणभक्षक प्राणी यांच्या आहुत्या पडतात याची कोणालाच जाणीव नसते का? राडारोडा टाकणारे तर सगळीकडेच बेबंद झालेले आहेत. स्थानिक प्रशासन आणि वनखातं इथे लक्ष देतंय याच्या अद्यापतरी काही खुणा दिसलेल्या नाहीत. 

टेकडी अद्भूत आहे. ती वेड लावते. ती मोहित करते. निसर्गाची वेगवेगळी रूपं, वेगवेगळे आकार, वेगवेगळे रंग ती दाखवते. कधी हरखून टाकते, कधी विचारप्रवृत्त करते. कोणत्यातरी झुडूपाच्या, झाडाच्या, प्राण्याच्या, किटकाच्या सर्व जीवनचक्राचं दर्शन घडवते. निसर्गातले सगळे जीव एकमेकांवर कसे अवलंबून आहेत, हे कोडं थेट उलगडूनच दाखवते. कचरा, राडारोडा, वणवे याची इथला निसर्ग खंत करत बसत नाही. इथलं जीवनचक्र पुढे रेटत राहातो. पण व्हायचं ते नुकसान होतच आहे. आपल्या नासधूस करण्याच्या वेगापुढे निसर्गाचा सर्जनाचा, पुनरुज्जीवनाचा वेग नगण्य ठरतो आहे. सगळं विश्व आपल्याला आंदण मिळालं आहे अशा उपभोगी वृत्तीपुढे निसर्ग हतबल होतो आहे. आपण आपल्या परीने इथे स्वच्छता ठेवण्याचा आणि हिरवाई वाढवण्याचा प्रयत्न करत राहाणं हे मात्र नक्कीच शक्य आहे. ते आम्ही करत आहोत, करत राहू. 

-रूपाली भोळे, अश्विनी  केळकर











Saturday, 10 April 2021

.. तव्हा बोरी बाभयीच्या आले अंगावर काटे

 

..टेकडीवर नांदणारा निसर्ग नेहमीच धुंदीत असतो, त्याची रूपं पालटतांना पाहणं अवर्णनीय वाटतं. निष्पर्ण झाडं.. त्याला फक्त लगडलेली फळं-फुलं, कुणाला फक्त चमकदार पालवी.. सकाळच्या उन्हात अजून ठसठसून उठून दिसणारी, कुणाच्या फांद्यांच्या टोकावर आलेली फक्त फुलं, कुणाची लाल जर्द पालवी, तर कुणाच्या निष्पर्ण फांद्या आकाशाकडे झेपावणाऱ्या, कुणी फक्त फळ, बिया घेऊन उंच उतारावर उभा.. आणि जमिनीवर पाल्याचे आच्छादन.. फाल्गुनात तापणाऱ्या जमिनीला शांत करण्याच्या नादात.. 

तर पक्षी गवतात शिरून अन्न मिळवणाऱ्या पक्ष्यांनी आपल्या बैठका मोह, आपटा यांच्या डोक्यावर थाटल्या. काही चिमणी वर्गातील पक्षी गवताच्या बिया मिळवण्याच्या प्रयत्नात, टिटव्यांचे आवाज आणि पाकोळयांची फडफड आता जाणवायला लागली.

Indian Silverbill (शुभ्र कंठाची मुनिया)
Indian roller, चास 

इथल्या प्रत्येक गोष्टीला चित्र म्हणावं की संगीत? दरवेळी त्याच चौकटीत पण दरवेळी सादरीकरण निराळंच..



पेटारा (Mountain gadenia) फुलला असेल का गं अश्विनी? असं म्हणून आम्ही दोघी त्या दिशेने चालू लागलो. शहराच्या तसं जवळ उतारावर हे एक झाडांचं एक बेट म्हणूया.. तिथलं तेंदुसारखं आबनुसाचं झाड कधीचंच बोलावत होतं. त्याच्या भेटीत शेजारच्या जाळीतील करवंद आणि करवंदाच्या पानांसारखंच काहीतरी.. वाघाटी की गोविंदी? ..

आम्ही भसभसा चालत त्या झुडूपाकडे वळलो. वाघाटी लाल-तांबूस आणि पांढऱ्या फुलांनी बहरली होती. काटेरी झाडीतील फुलोरा, पक्ष्यांची कुजबूज, चाहूल आणि सूर्यास्त .. सुखावणारं  सगळं. चढत्या फाल्गुनात जाळीतील शीतल छाया अनुभवावी की सुगंध पोटात गच्च साठवावा की आकाशाकडे पाहून फुललेलं ते रुपडं डोळ्यात साठवावं, अशी आमची स्थिति होती. 

वाघाटी तिची लालतांबूस पांढरी फुले लेऊन आकाशासारखी विस्तीर्ण पसरलेली. बागडत, हसत, खेळत करवंदाच्या जाळीत हुंबावर, हरणदोडीसह अडकलेली. तिची पांढरी तांबूस फुले आकाशाच्या रंगाशी एकरूप झालेली. 

वाघाटीचं शास्त्रीय नाव Capparis Zeylanica L, Caper या शब्दापासून capparis या शब्दाची व्युत्पत्ती, म्हणजे बागडणार, उड्या मारत चढणारं.. लॅटीन भाषेत बकरीचं, मेंढयाचं पिल्लू (लॅम्ब),



जमिनीपासून एखाद मीटर सरळ वाढलेलं खोड, नंतर फाटे फुटून वेलासारखं. आजूबाजूच्या झाडोऱ्यावर रांगलेलं. यातून निर्माण होणाऱ्या जाळीमुळे सरपटणाऱ्या प्राण्यांना, पक्ष्यांना, सशांना सुरक्षित वाटत असावं. 

टोकदार पेन्सिलीने वीस ते तीस अर्ध गोल एका बिंदूत एकत्र आणल्याप्रमाणे फुलांचे पुंकेसर आणि बिजांडकोष एका देठावर उंच असा. 

फुले पानाच्या बगलेत, फुले उमलताना पांढरी नंतर गुलबट जांभळी होतात, चार सुटसुटीत पाकळ्या, जांभळ्या-गुलाबी रंगाचे असंख्य पुंकेसर, फांदीवर प्रत्येक ठिकाणी दोन काटे आणि त्यातून बाहेर आलेली साधी अंडाकृती छोटी पाने, पानाच्या मागच्या बाजूला मुख्य शिर ठसठशीत . . वाघाच्या नखांप्रमाणेकाटे असल्याने वाघाटी नाव पडल्याचा उल्लेख सापडतो.

वाघाटीचे  रुपडे साठवून आठवड्याने परत फळांचे फोटो घेण्यासाठी धावलो . . थंबकलो . . आणि धक्काच बसला.

वाघाटी, करवंद, आबनुसाच्या जाळीचा मागमूसही नव्हता, जवळजवळ वर्षभरापासून येथील विविधता आम्ही टिपत होतो, या भेटीत राडारोडा टाकून टेकडीवर सपाटीकरण केलेले दिसले. या जाळीवर कित्येक पक्षी, खारी, ससे यांचा वावर आम्ही निरखला होता.



आषाढी एकादशीला वाघाटीच्या कोवळ्या फळांची भाजीवर उपास सोडण्याचा प्रघात आहे, कदाचित अशा प्रथा या कित्येक वनस्पती आणि त्यावर अवलंबून असणारे जीव यांच्यासाठीच असाव्या का? भाबड्या श्रद्धेने या वनस्पतीचे रक्षण केलं असावं पण वाढत्या शहरीकरणात ती कापली, दाबली गेली.

कदाचित माणसाच्या अशा पद्धतीच्या निष्ठूर वर्तनामुळेच तर काही झाडांच्या अंगावर काटे येत असतील का, अशी कल्पना बहिणाबाईंनी एका कवितेत केली असावी का?

 

राड्यारोडयाला ओरबाडून वाघाच्या नखांची वाघाटी येत्या श्रावणात हिरव्या धुंदीत उफाळून येईल का? वाघाटीच्या जाळीतून जाणवलेल सूर्यास्ताचं चित्रं आणि संगीत मला परत अनुभवता येईल का?

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

शास्त्रीय नाव : Capparis zeylanica  L.
कुळ: Capparaceae
स्थानिक नावे: वाघाटी, गोविंदी, व्याघ्रनखी, वाअंगुटी, गोविंदफळ 


रूपाली भोळे 
११ एप्रिल २०२१ 
proopalee@gmail.com 

Saturday, 3 April 2021

गगना गंध आला - मधुमास धुंद झाला

     माघ सरता सरता थंडी कुठे पळाली, कळलंही नाही. वाढता उन्हाळा चांगलाच जाणवू लागला आणि टेकडीवर ब-याचशा झाडांची पानगळही सुरू झाली. टेकडी उदासवाणी वाटू लागली. त्यातच भर म्हणून, टेकडीवरच्या माळावर रविवारी क्रिकेट खेळायला येणा-या क्रीडाप्रेमी मंडळींनी माळावरचं गवत जाळून टाकल्यानं आणखीनच भकास, हताश वाटू लागलं. पण इथे ना, काहीच कायमस्वरूपी नसतं. बदल हाच स्थायीभाव....बदल, बदल, सतत बदल. गवत जाळल्याची खंत करणं नाही की सुगीच्या दिवसात अडकून पडणं नाही. पानगळ, नवी पालवी, फुलोरा, फलन, पुन्हा पानगळ. टेकडीवरची सृष्टी सतत नवं रूप घेत असते. रस्त्याच्या, झाडांच्या नेहमीच्या खाणाखुणा हरवतात, नव्या खुणा गवसतात.  

फाल्गुनात मधेच पावसाच्या दोन हलक्या सरी काय कोसळल्या, आणि टेकडीवरच्या माळाने करपलेल्या, जळालेल्या गवताचा काळा रंग पुसूनच टाकला! तिथे कोवळ्या हिरव्या गवताची चाहूल लागली.  माळावर पुन्हा टिटव्या, चंडोल, घरट्यासाठी जागा शोधू लागले. रानात आपटा, मेढशिंगी, शिंदी सारखी काही मोजकी मंडळी सोडता सगळ्या झाडांनी आपली पानं गाळून टाकली. आता इथे चैत्राची, सर्जनाची, नवचैतन्याची चाहूल आहे. पंचांगाप्रमाणे भलेही चैत्र-वैशाख वसंतऋतू असेल, पण इथे केव्हाचाच वसंतोत्सव सुरू झालेला आहे. टेकडीवरचा निसर्ग मधुमासाच्या धुंदीत आहे.  .   

दोन महिन्यांपूर्वी टेकडीवरचे शिरीष पर्णहीन झाले आणि झाडावर केवळ सोन्याच्या लगडींसारख्या दिसणा-या शेंगा शिल्लक राहिल्या. सध्या मात्र सगळे शिरीष  कोवळ्या पालवीबरोबरच पांढरट-पोपटी गोंडेदार फुलांनी सजले आहेत. घमघमत फुलत आहेत. चढणीवरचे कडुनिंबही मोहोरले आहेत. टेकडीची चढण चढू लागलं की पायथ्यापासूनच पहाटेच्या सुखद गारव्यात मिसळलेल्या शिरीषाच्या, कडुनिंबाच्या गंधाच्या लाटा आपल्याला वेढून टाकतात. सगळा आसमंत सुगंधी करतात. गगना गंध आला..मधुमास धुंद झाला..शांताबाईंच्या ओळी मनात रुणझुणत राहातात. 

झाडीत शिरावं, तर पायातळी सुकलेल्या पानांचा खच आणि निष्पर्ण झाडांच्या फांद्याफांद्यांवर कोवळ्या अंकुरांचे धुमारे! मधेच कुठे पांगा-याच्या केशरी तु-यांचं केशरशिंपण आणि त्यावर कावळे, टकाचोर, भारद्वाज, मैना, कोतवालापसून ते लिंबूटिंबू सनबर्ड पर्यंत सगळ्या पक्ष्यांची उडालेली झिम्मड. कुठे मोहाच्या लालजर्द पालवीच्या पताका आणि त्याखाली कळ्याफुलांच्या घोसांची झुंबरं.  टेकडीवरचे पळसही मजेदार. माळावरचा छोटा पळस केव्हाच फुलून, सुकलाही - त्याला आता पापड्याही लागल्या. पण रानातला प्रौढ पळस मात्र अजूनही हिरवाच आहे. त्याचं कसं सगळं रीतीप्रमाणे, बैजवार! छोट्या पळसासारखा नाचरेपणा नाही. उन्हाळा चांगला तापल्याशिवाय तो फुलत नाही. 



     टेकडीवरचा पेटरा (Mountain gardenia/ Gardenia turgida) पांढ-याशुभ्र फांद्याफांद्यांच्या जाळीवर पांढरी आणि पिवळी सुगंधी फुलं लेवून नटला आहे. आणि त्याचे फोटो काढण्यासाठी एका संध्याकाळी टेकडीवर गेलो, तर एका ओळखीच्या झाडीत ’गोविंदी’ची (Capparis Zeylanica) नवलाईची वेल फुललेली दिसली. गर्द गुलाबी आणि पांढरे नाजूक केसर, सुगंधाची पखरण आणि सगळ्या वेलीवर मधमाशांची गुणगुण. सगळी संध्याकाळच हसरी, गुलाबी, सुगंधी होऊन गेली.   

                                                

इथे बोंडाराही (Lagerstroemia parviflora) पुष्कळ आहे. वर्षभर आम्ही त्याच्या फुलण्याची वाट पहात होतो. गेल्या आठवड्यात हा कळ्यांच्या मण्यांनी सजलेला दिसला.  दोन दिवसांपूर्वी पाहिलं, तर गुलाबी केसरांच्या पांढ-याशुभ्र फुलांचा बहर मिरवत उभा होता. त्यावर मधमाशा तर इतक्या की दहा फुटांवरून गुणगुण ऐकू येत होती. आणि सुगंध? त्याला तर काही नावच देता नाही येत. डोळे मिटून, खोल श्वास घेऊन अनुभवायचा आणि आत साठवून ठेवायचा फक्त. 
आले वनावनात - सहकार मोहरून। भ्रमरास मंजिरीची - चाहूल ये दुरून। भरला मरंद कोषी - भरला प्याला। मधुमास धुंद झाला! .. इथे ’सहकार’ म्हणजे आंब्याची झाडं नाहीत, पण मोई (Lannea coromandelicum) आणि चारोळी (Buchanania cochinchiinensis)ला सुगंधी मोहोर येऊन फळं धरु लागली आहेत. दहिवण (Cordia macleodii) फुलो-यावर आहे. वारस (Heterophragma quadriloculare) फुलला आहे आणि आपटाही. आणि या प्रत्येक फुलो-याचा निराळाच गंध आहे. एक उग्र तर एक हलका. एक मधुर तर एक मदिर. किती फुलांचे रंग गणावे, कुणा सुगंधा काय म्हणावे.. अशी आनंदविभोर अवस्था होऊन जाते. गंधवती सृष्टी!
हा ही जेमतेम पंधरा दिवसांचा खेळ. मग इथली सृष्टी आणखी वेगळं रूप घेईल. सगळ्या कळ्या फुलतील, फुलून सुकतील, फळं धरतील, मोठी होतील, त्यात बी तयार होईल, फळं उकलतील आणि आतल्या बिया कुणी वा-याबरोबर, कुणी पाण्याबरोबर, कुणी आमच्या पायाला चिकटून, कुणी इथल्या शेरडांच्या पाठीवरून, कुणी पक्ष्यांच्या पोटातून प्रवास करत कुठेकुठे जाऊन पडतील, रुजतील. जीवनचक्र चालू राहील.

- अश्विनी केळकर