निसर्गात जे जे काही आहे, ते ते माणसाच्या उपभोगासाठीच अशा निर्लज्ज आणि बेफिकीर वृत्तीचा प्रत्यय टेकडीवर पावलोपावली येतो. टेकडी चढताना सुरुवातीलाच एक नाला ओलांडावा लागतो. तो नाला वर्षभर प्लास्टिक कच-याने भरलेला असतो. पावसाळ्यात त्यातून वाहाणारं पाणी सगळा कचरा रामनदीतून पाषाण तलावात वाहून नेण्याचा प्रयत्न करतं. चढ चढताना एका झाडीत प्लास्टिकच्या बाटल्या, ड्रम, जुने कपडे टाकलेले दिसतात. पावसाळ्यात ते कळत नाही, पण उन्हाळ्यात दाटी कमी झाली की त्या कच-याने अस्ताव्यस्त पसरलेले हातपाय दिसतात. (त्यातल्याच कपड्यांचे धागे घेऊन मुनियाने जवळच्या तेंदूच्या झाडावर घरटं बांधलंय).
माळावरून आणि चढावरच्या झाडीतून चालताय? जरा जपून. त्याचं काय आहे, या जागा ना, फार निवांत आहेत. फारसं कुणी फिरकत नाही इथे. त्यामुळे आपल्याला हवी ती देशी/ विदेशी दारू, सोबत सोडा नाहीतर पाणी (तेही बाटलीबंदच), प्लास्टिकच्या पिशव्यात पॅकबंद केलेल्या कुरकुरीत चविष्ट पदार्थांचा चखणा, प्लस्टिकचे ग्लास, असं सगळं घेऊन आपल्यासारख्याच मित्रमंडळींबरोबर इथे यावं आणि नशेत धुंद व्हावं अशी इथे पद्धत आहे. हे ही एकवेळ ठीक. पण त्या सगळ्या काचेच्या, प्लास्टिकच्या बाटल्या, प्लस्टिकच्या पिशव्या सगळं तिथेच सोडून जायचं अशीही इथे पद्धत आहे. हे ही एकवेळ ठीक. पण त्या काचेच्या बाटल्या फोडून टाकायचीही पद्धत आहे. त्या काचा झाडीत विखूरलेल्या असतात. म्हणून म्हणलं, माळावरून आणि चढावरच्या झाडीतून चालताना जरा जपूनच चाला.
टेकडीवर विस्तीर्ण माळ आहे. पावसाळ्यात तिथे इतकं दाट गवत वाढतं, की त्यातून चालणंच अशक्य होऊन जातं. इथे किती आयुष्य़ं फुलतात. टिटव्या, चंडोल, धानचिमण्या, होले, चाष, हुदहुद, बुलबुल, वटवटे, मुनिया, कोतवाल, साळुंक्या, मोर, सुगरणी....किती नावं घावीत. शिवाय फुलपाखरं, चतुर, खंडोबाचे घोडे, साप. इथे ससेही केवढेतरी आहेत. सगळ्यांचं जीवनचक्र या माळावरच्या गवताशी बांधलेलं आहे. गवताच्या प्रकारांची मोजदाद करणं आम्हाला अजून जमलेलं नाही, पण तेही असंख्य प्रकार आहेत. हिवाळा सुरू होतो, तसा गवताचा रंग सोनेरी होत जातो आणि गवत वाळू लागतं. त्या वाळलेल्या गवताच्या बियांवर अजूनही चंडोल, सुंगरण, मुनिया यांचे थवे चरत असतात. गवत वाळू लागतं, तशी या सदस्यांबरोबर आणखीही अनेकांची पावले टेकडीकडे, माळाकडे वळतात. टेकडी तर सर्वांचीच. इथे कोणीही सर्रास येऊच शकता. माळावर गाड्या फिरवू शकता, डॉग ट्रेनिंगचे सेशन्स घेऊ शकता. दारू प्यायला, पिझ्झा खायला, कोल्डड्रिंक प्यायला, स्मोक करायला, सेल्फी काढायला, नाचायला, वॉक करायला, प्राणायाम करायला, सूर्य स्नान करायला, प्रेम करायला टेकडीवर मोकळ्यावरच्या, खोपच्यातल्या, झाडीतल्या जागा भरपूर आहेत. मग एखाद्या रविवारी सकाळी टेकडीवर गेलं की एरवी शांत असणारी टेकडी क्रिकेटप्रेमींनी गजबजलेली दिसते. दुचाकी, तीनचाकी, चारचाकीतून ही मंडळी आलेली असतात. माळाकडेला गाड्या लावून तीनचार टीम्स क्रिकेट खेळत असतात. हे सगळं करतांना निष्पर्ण (पानं गळून पालवीकडे वळू पाहणाऱ्या) झाडांची, गळून गेलेल्या पाचोळयाची, पिवळ्या धम्म गवताची अडचण वाटू लागते. या प्रश्नावरचं उत्तर सोप्पं असतं. चुटकी में सुलझाओ, तुम्हाला फक्त एक आगकाडी किंवा जळती सिगारेट पुरेशी आहे. बघता बघता इथे डोलणारं सोनेरी गवत जळून खाक होतं. आम्ही सकाळी टेकडीवर जातो तेव्हा पायाखालची जमीन काळीठिक्कर पडलेली असते. गवतात पूर्वी कधी पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या तिप्पड होऊन पडलेल्या असतात. त्या काळ्या गवतातच इवले पक्षी काहीबाही शोधत राहिलेले असतात. काय शोधतात? माहीत नाही.
टेकडीवरचा राडारोडा हे तर एका रात्रीतील आश्चर्य आहे, काल पाहिलेलं झाड, फुललेली वेल आज पाहायला जावी, तर ती राडारोड्याचा ढिगाखाली अदृष्य झालेली असते. हळूहळू या आश्चर्याचे ढीग वाढू लागलेत, टेकडीवरील राड्यारोडया मुळे पावसाचे पाणी वाहून नेणारे असंख्य प्रवाह बंद होणार आहेत. या प्रवाहावर अवलंबून असलेली जीव साखळी येत्या श्रावणात आतुरतेने पाण्याची वाट पाहील. मोई, चारोळी, बीजा, मोह अशा अनेक वनस्पतींच्या पायाजवळील काळी कसदार जमीन आता राखाडी, कचरायुक्त, सिमेंट युक्त होऊन निर्जीव दिसू लागली आहे.
ह्या सगळ्यांना जबाबदार कोण? माणूस? हो, माणूसच. असं सोपं उत्तर देऊन आपण मोकळे होतो. अरे माणसा माणसा कधी होशीन माणूस? अशी ओळ सहज उद्धृत करतो. पण असं एकूणच मनुष्यप्राण्याला गुन्हेगार ठरवल्यानं हा प्रश्न सुटणार आहे का? म्हणजे जणू टेकडीवर प्रेम करणारे, टेकडीवरच्या जैवविविधतेचा अभ्यास करणारे, टेकडी छान, नीटनेटकी रहावी म्हणून प्रयत्न करणारे कोणी वेगळ्या ‘माणूस’ जातीतले – आणि टेकडीवर कचरा करणारे, राडा-रोडा टाकणारे, टेकडीवर वणवे लावणारे वेगळ्या ‘माणूस’ जातीतले आहेत की काय? टेकडीवरच्या मोकळ्या वा-याची भूल सर्वांनाच पडते. इथे सगळ्या प्रकारचे लोक सगळ्या प्रकारच्या कारणांसाठी येणार. त्या सगळ्यांसाठी इथे काही बेसिक गोष्टी करता येतील का? आमच्या सारखे आणखीही काही जण टेकडीवरचा कचरा गोळा करतात, तेव्हा मोठा प्रश्न येतो तो कचरा खाली घेऊन येण्याचा. मग पुढे त्याचे वर्गीकरण करणे, मग त्याची वेगवेगळ्या पद्धतीने विल्हेवाट, वगैरे. मग इथे बंद कचरापेट्या ठेवून त्यातला कचरा उचलण्याची सोय करता येऊ शकते का? टेकडीचा बराचसा भाग DRDO च्या अखत्यारीत आहे. तिथे या सगळ्याचे प्रमाण कमी आहे. बाकीचा भाग नक्की कोणाकडे आहे - वनखात्याकडे, ग्रामपंचायतीकडे, की कोणाच्या खाजगी मालकीचा? याची अद्याप आम्हाला कल्पना नाही. लोक वेगवेगळ्या कारणांसाठी येतात ते खरोखरच गरज म्हणून येतात. मैदानं शिल्लक नाहीत, जी आहेत ती वाईट अवस्थेत हे ही खरेच. अगदी मद्यपानासाठी झालं, तरीही टेकडीसारखी निवांत जागा ही गरज असूच शकते ना? मग यासाठी टेकडीचा वापर करणारे दोषी की सगळ्यांना खेळण्याच्या, मनोरंजनाच्या सोयी उपलब्ध करून न देऊ शकणारी यंत्रणा दोषी? खेळायला मैदान हवं, तरीही सगळा माळ जाळायची काहीच गरज असते का? एकदा का वणव्याने पेट घेतला की त्याला सुरक्षित-असुरक्षिततेच भान राहणं अवघड आहे. वणवे लावणारे तितक्याच जबाबदारीने तो पसरू नये याची काळजी घेतात का? हव्या तेवढ्याच जागेतलं गवत जाळणं जमू शकेल का? किंवा थोडा कष्टाचा आणि खर्चिक पर्याय असला, तरी हव्या तेवढ्या जागेतलं गवत कापणं हा पर्याय असू शकेल का? आपल्या बेफ़िकीरीपायी या वणव्यात कितीतरी सरपटणारे प्राणी, कित्येक पक्षांची दगडाच्या खोबणीतील अंडी, अनेक वनस्पती, गवत, तृणभक्षक प्राणी यांच्या आहुत्या पडतात याची कोणालाच जाणीव नसते का? राडारोडा टाकणारे तर सगळीकडेच बेबंद झालेले आहेत. स्थानिक प्रशासन आणि वनखातं इथे लक्ष देतंय याच्या अद्यापतरी काही खुणा दिसलेल्या नाहीत.
टेकडी अद्भूत आहे. ती वेड लावते. ती मोहित करते. निसर्गाची वेगवेगळी रूपं, वेगवेगळे आकार, वेगवेगळे रंग ती दाखवते. कधी हरखून टाकते, कधी विचारप्रवृत्त करते. कोणत्यातरी झुडूपाच्या, झाडाच्या, प्राण्याच्या, किटकाच्या सर्व जीवनचक्राचं दर्शन घडवते. निसर्गातले सगळे जीव एकमेकांवर कसे अवलंबून आहेत, हे कोडं थेट उलगडूनच दाखवते. कचरा, राडारोडा, वणवे याची इथला निसर्ग खंत करत बसत नाही. इथलं जीवनचक्र पुढे रेटत राहातो. पण व्हायचं ते नुकसान होतच आहे. आपल्या नासधूस करण्याच्या वेगापुढे निसर्गाचा सर्जनाचा, पुनरुज्जीवनाचा वेग नगण्य ठरतो आहे. सगळं विश्व आपल्याला आंदण मिळालं आहे अशा उपभोगी वृत्तीपुढे निसर्ग हतबल होतो आहे. आपण आपल्या परीने इथे स्वच्छता ठेवण्याचा आणि हिरवाई वाढवण्याचा प्रयत्न करत राहाणं हे मात्र नक्कीच शक्य आहे. ते आम्ही करत आहोत, करत राहू.
-रूपाली भोळे, अश्विनी केळकर